
बुलडाणा, (न्यूज महाराष्ट्र लाईव्ह) प्रतिनिधी
बुलडाणा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची 31 वी सभा मौजे शेलूद येथे प्रगतशील शेतकरी स्वप्नील महाजन यांच्या शेतावर पार पडली. सभामध्ये शून्य मशागत तंत्रज्ञानाचे महत्त्व, जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे संवर्धन, पिक लागवड खर्चात बचत, जमिनीची धूप रोखणे आणि पर्यावरण संतुलन याविषयी शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. दीपक जोशी यांनी शून्य मशागत तंत्रज्ञानामुळे सेंद्रिय कर्ब वाढून शेती उत्पन्नात भर पडते, असे सांगितले.
कार्यक्रमात खरीपातील कीड-रोग नियंत्रणावर शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद झाला व प्रक्षेत्र भेटही घेण्यात आली. यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. अमोल झापे, उद्यानविद्या तज्ञ डॉ. अनिल तारू, कृषी हवामान तज्ञ मनेश यदुलवार, दीपक काका जोशी, श्याम गट्टाणी, डॉ. बी. आर. पाटील, माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ कापूस संशोधन, तसेच इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनेश यदुलवार यांनी केले.
