
चिखली,(न्यूज महाराष्ट्र लाईव्ह) चिखली प्रतिनिधी,शेतकऱ्यांच्या जीवनात अस्मानी संकटांचा सुरू असलेली साखळी शासकीय उपायांनी कमी करावी यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेता महाले पाटील यांनी माहितीचा मुद्दा विधिमंडळामध्ये बोलून दाखविला, त्या अंतर्गत चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये समाधानकारक पाऊस पडल्यामुळे सोयाबीन चांगल्या प्रमाणात उगवले आहे परंतु आता कोळपणीच्या टप्प्यातच सदर पिकावर हुमणी अळीचा जबरदस्त हल्ला झाल्याने पीक मुळासकट नष्ट होत आहे. ही अळी मुळाशी व खोडाशी हल्ला करून पीक नष्ट करत आहे त्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे कृषी विभागामार्फत या अळीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणचे ताबडतोब पंचनामे करून घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आग्रही मागणी आमदार सौ श्वेता महाले पाटील यांनी सभागृहाकडे केली.मतदारसंघात हुमनी अळी सोयाबिन पिकावर पडली असून या मूळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.चिखली विधानसभा मतदार संघातील विशेषता 12 गावांमध्ये सोयाबीनचे हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे, व कीड रोगामूळे नुकसान झाले असून ( तालुक्यातील देऊळगाव धुबे, मेरा बु., कोनड खुर्द, खंडाळा मकरध्वज, शेलगाव जहाँगीर, मुंगसरी, अन्वी, तेल्हारा, मेरा खुर्द, अंत्री खेडेकर, सोमठाणा, दिवठाणा आदी गावांतील शेतात हुमणी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून आला आहे.)कृषी विभाग व कृषी शास्त्रज्ञ यांनी पाहणी करून या अळीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी त्यावर कृषी विभागाच्या सल्यानुसार डवरणी, स्प्रिंकलर लावणे, औषधी फवारणी केली तरी सुद्धा अळी नियंत्रणात येत नाही आहे.तसेच शासन निर्णयात किंवा पिक विमा योजनेमध्ये किड रोगाने, अळीने पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळणे संदर्भात तरतुद नाही. अशा वेळेस निसर्गाच्या प्रकोपामुळे परेशान झालेल्या शेतकऱ्याला सरकारकडून मदतीचा हात मिळणे गरजेचे असून, या भागातील शेतकरी शासनाकडे आशेने बघत आहे.असे आ. सौ श्वेता महाले यांनी सभागृहाला सांगितले.
या हुमणी अळीमुळे किंवा कीड रोगामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करून विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासंदर्भात संबंधितांना आदेश देण्यात यावे अशी विनंती आ. सौ श्वेता महाले यांनी शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला केली.
आमदार सौ श्वेता महाले यांनी विधिमंडळ सभागृहामध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन या सदरात हा मुद्दा मांडला आणि राज्याचे कृषिमंत्री यांनी या मुद्द्याची लगेच दखल घेऊन आमदार सौ श्वेता महाले यांना यासंबंधी चर्चा करण्यासाठी आमंत्रण दिले. आमदार सौ श्वेता महाले यांनीही वेळ न दवडता कृषिमंत्री यांची भेट घेऊन त्यांना या अळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे संपूर्ण विवरण केले व शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी लेखी निवेदनही दिले.
राज्याचे कृषिमंत्री यांनीही शेतकऱ्यांच्या आवाज बनून आलेल्या आ. सौ. श्वेता महाले पाटील यांच्या निवेदनाला प्रतिसाद दिला. आणि बुलढाण्याचे कृषी अधिकारी श्री मनोज कुमार ढोके यांच्याशी त्वरित दूरध्वनीवरून संभाषण साधत बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले.
कित्येक दशकापासून लाल फीतशाहीचा आरोप होत असलेल्या शासकीय कामांमध्ये आमदार सौ श्वेता महाले यांनी माहितीचा मुद्दा विधिमंडळात मांडणे, काही क्षणात कृषिमंत्र्यांचा त्यांना फोन येणे, कृषिमंत्र्यांनी परिस्थिती समजावून घेणे आणि लगेच जिल्ह्याच्या कृषी अधिकारी यांना फोन करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे असा आदेश देणे, या सर्व बाबी “आजचा दिवस माझा” या सिनेमाची आठवण व्हावी तेवढ्या तत्परतेने करण्यात आल्या त्यामुळे जनमानसात शासन, मुख्यमंत्री, मंत्री मंत्रिगन, व लोकप्रतिनिधी यांच्या बद्दल विश्वासाची भावना तयार होत आहे.
